Monday, December 13, 2010

सुखाच्या राशीवर

आनंद उवाच...............

सुखाच्या राशीवर भारावुन सुद्धा
मनमुराद स्वच्छंदी जगता आले पाहीजे
रथ चार अंगुळे आभाळात ठेउन
जमिनीवर मात्र चालता आले पाहीजे

दु:खाच्या डोहात खोल खोल बुडुन
आयुष्य असेच काही संपत नाही
अरिष्टांच्या हलाहलाचे प्याले रिचवुन
निळकंठ होऊन जगता आले पाहीजे

सांडायचा नसतो हा मनाचा कोंडमारा
फुका का दवडावी मनाची सुप्त शक्ती?
भरधाव सोडण्या कर्तुत्वाच्या वारुस
कोंडमाऱ्याचे इंधन करता आले पाहीजे

निधड्या छातीने निर्घृण वार झेलणे
वाट का पहावी या बेफिकीर क्षणांची?
ओळखुन नेमके आपले ते जिवघेणे शत्रु
लढ्यास समोर पाय रोवता आले पाहीजे

Tuesday, November 23, 2010

आतातरी पाऊस थांबेल असं सारखं वाटतंय

आनंद उवाच.....................

आतातरी पाऊस थांबेल असं सारखं वाटतंय,
माझ्या मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

तुझं येणं एक सुंदर पहाटस्वप्न होतं,
आसमंतात तुझं असणंच माझं सर्वस्व होतं,
ते स्वप्नंच आता हळुहळु फाटतंय,
माझ्या मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

तुझ्यासाठी कुठलेही शिवधनुष्य तोडले असते,
तुझ्याचसाठी ते तुटलेले धागेही जोडले असते,
पण नियतीच्या मनात काही वेगळंच घाटतंय,
माझ्या मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

तुझ्यामध्ये माझा "मी" चा निचरा झाला होता,
आपल्या विश्वात तुझ्या स्वजनांचा मात्र कचरा आला होता,
व्यवहारी किल्मिष हळुहळु मनात दुकान थाटतंय,
माझ्या मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

दोनाचे चार कुठे गेले आता शुन्यच येते फक्त बाकी,
पडले ते सुखांचे महाल, उरल्या मोडक्या खिंडारांची झांकी,
सारं गणितच चुकलंय हेच राहुन राहुन पटतंय,
माझ्या मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

एव्हढा पावसात भिजुनसुद्धा मन पुर्ण सुकलंय,
जुनाट वठलेल्या पिंपळासम धरेपार झुकलंय,
वैषम्याचं विष मात्र हळुहळु साठतंय,
माझ्या मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय..................................................